सहकार क्षेत्रात आपण कायम सिद्रामप्पा पाटलांबरोबर राहणार : सचिन कल्याणशेट्टींची भूमिका....
_________________________________________________
अक्कलकोट;दै.पंढरी- नगरी न्यूज : गेल्या आठ वर्षापासून बंद असलेला स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना माजी आमदार सिद्रामप्पा पाटील सुरु करीत आहेत, हे स्वागतार्ह आहे.
त्याकरिता लागणारी सरकारी पातळीवरील मदत करण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. आगामी काळात सिद्रामप्पा पाटील-सचिन कल्याणशेट्टी ही अभेद्य जोडी कायम राहील. सहकार क्षेत्रात आपण कायम 'अप्पा'बरोबर राहणार, अशी ग्वाही आमदार तथा भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर रविवारी (ता. ६ नोव्हेंबर) शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड आणि परदेश अभ्यास दौरा यशस्वी केल्याबद्दल कल्याणशेट्टी यांचा तसेच तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे नूतन अध्यक्ष व पंचकमिटी, संचालक यांचा सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला उत्तर देताना आमदार कल्याणशेट्टी बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे होते.
आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, बंद पडलेला कारखाना रात्रीचा दिवस करुन माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे. सहकार क्षेत्रात अप्पांनी आत्मविश्वास आणि श्रध्दा ठेवल्यानेच त्यांना आजवर यश मिळालेले आहे. साखर कारखाना सुरु करण्याच्या निर्णयाने पहिला मला आनंद झाल्याचे सांगून १९९९ पासून आजतागायत कारखान्याची जडण-घडण पाहिल्याचे सांगून पहिल्याच गळीत हंगामात अतिरिक्त तालुक्यातील ऊसामुळे शेतकर्यांच्या अडचणीच्या काळात स्वामी समर्थ साखर कारखान्याने मोठी साथ दिल्याचे आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले. तालुक्यातील आगामी जिल्हा बँक, बाजार समिती, कारखाना, सहकारी संस्था या निवडणुकीत आपण अप्पांबरोबर राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सिद्रामप्पा पाटील म्हणाले की, रखडलेला स्वामी समर्थ कारखाना, त्यानंतरचे गळीत हंगाम व आठ वर्षांपूर्वी बंद पडलेल्या कारखान्याबाबत त्यांनी माहिती देवून शेतकर्यांच्या हितासाठी कोणत्याही बँकेची वाट न पाहता स्वत:ची जमीन गहाण ठेवून कारखाना सुरु करीत आहे. पुढील काळात कारखान्याकडून उपपदार्थ निर्मितीवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या प्रक्रिया देखील सुरु करण्यात आलेली आहे. इतर कारखान्यापेक्षा चांगला भाव शेतकऱ्यांना मिळावा, असा माझा प्रयत्न राहणार आहे. शेतकऱ्यांनीही ऊस देवून कारखान्याला सहकार्य करावे, असे आवाहन सिद्रामप्पा पाटील यांनी केले.
व्यासपीठावर कारखान्याचे उपाध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, पक्षनेते महेश हिंडोळे, माजी सभापती महिबूब मुल्ला, संजीवकुमार पाटील, सिध्देश्वर कारखान्याचे संचालक काशिनाथ कोडते, सुरेश झळकी, माजी जि. प. अध्यक्ष शिवानंद पाटील, अप्पासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते अंबणप्पा भंगे, कारखाना संचालक संजीव पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जिल्हा बँकेचे वरिष्ठ अधिकारी मल्लिनाथ दुलंगे, सूत्रसंचालन मल्लिनाथ भासगी यांनी केले.