अस्मानीने कंबर मोडली तर सुलतानीमुळे शेतकऱ्यांच्या गळ्यावर सुरा, टोमॅटोचे दर घसरले
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) : अस्मानी संकट आणि आता सुलतानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी शेतात पिकवत असलेल्या पिकांमुळे आर्थिक नफा मिळत नसल्याने शेतकऱ्याचे बजेट कोलमडले आहे.सध्या टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी प्रचंड नाराज झाले आहेत. मागच्या वर्षी टोमॅटोला भाव चांगला होता. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. यामुळे टोमॅटोचे उत्पादन वाढले आणि भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
सध्या टोमॅटोचा भाव किरकोळ बाजारात ५० रुपयेच्या वर पोहोचू शकला नाही, तर घाऊक बाजारात टोमॅटोचा भाव दोन रुपये किलोवर गेला आहे. गतवर्षी शेतकऱ्यांचा टोमॅटो ४०० ते ५०० रुपये प्रति कॅरेटने विकला जात होता. या वेळी नवीन आलेला टोमॅटो प्रति कॅरेट १५० ते २०० रुपये भावाने जात आहे.
दर्जेदार टोमॅटो असूनही व्यापारी ते चढ्या दराने घेत नाहीत. याचे कारण मागणी कमी आणि उत्पादन जास्त झाल्याचे बोलले जात आहे. टोमॅटोची बाजारात एवढी आवक होत असल्याने व्यापाऱ्यांना त्याचा वापर करणे कठीण झाले आहे.
टोमॅटोचे उत्पादन वाढल्याने इतर राज्यांतील मागणीही घटली आहे. किरकोळ विक्रेतेही मोठ्या प्रमाणात टोमॅटो खरेदी करत नसल्याचे चित्र आहे. सध्या टोमॅटोचे दर पुढचे काही दिवस असेच राहण्याची शक्यता आहे.
टोमॅटो स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. टोमॅटोला एवढा कमी भाव मिळत असल्याने त्याचा खर्चही वसूल होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं. गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे.
घाऊक भावात घट झाल्याने किरकोळ बाजारातही टोमॅटो स्वस्त झाला आहे. यासोबतच मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने टोमॅटोचे पीकही उद्ध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांना घाऊक २ रुपये तर किरकोळ ५ रुपये किलो भाव मिळत आहे.