संभाजीराजेंच्या `स्वराज्य`, संघटनेच्या वीस शाखा दानवेंच्या मतदरासंघात..
_________________________________________________
जालना;(प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीराजे यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर जालना जिल्ह्यात आपल्या `स्वराज्य`, संघटना स्थापनेचा धडका सुरू केला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना लोकसभा मतदारसंघातील भोकरदन आणि बदनापूर अशा दोन तालुक्यात तब्बल २० शाखा स्थापन करण्यात आल्या आहेत.
पैकी १५ शाखा या भोकरदन तालुक्यात स्थापन झाल्या आहेत. भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथे स्वराज्य संघटना शाखेचे उद्धाटन महिलांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर तालुक्यातील विविध ठिकाणी अशा १५ शाखांचे उदघाट्न करण्यात आले.
स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून शेतकरी,विध्यार्थी,महिला,सहकार, शिक्षण या सर्वच विषयावर संघटना मोठ्या ताकदीने काम उभे करणार असल्याचे यावेळी संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. गाव तिथे शाख, घर तिथे स्वराज्य या उद्दिष्ट पूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.
जनतेचे अफाट मिळणारे प्रेम मनोबल उंचावत आहे, अशा भावना संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केल्या. संभाजीराजे म्हणाले, स्वराज्यकडून जनतेच्या असणाऱ्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेने कार्यरत राहू. तसेचचांगल काम करणाऱ्यांना कुणी त्रास देत असेल तर त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे.
त्यामुळे मोठ्या ताकदीने सर्वसामन्यांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवून वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करतांनाच गावाकऱ्यांचे प्रेम बघून आपण भारावून गेलो असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोना काळात येथील गावाकऱ्यांनी लोकवर्गणीतून सुरु केलेल्या अभ्यासिकेला देखील संभाजीराजे यांनी भेट देऊन विध्यार्थ्यांशी संवाद साधला. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वराज्य संघटनेच्या शाखांचे उद्घाटन तेही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघात झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.